IND vs AFG: महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या एकमेव कसोटी (Test) सामन्यात भारतीय संघानं अफगाणिस्तानचा एक डाव आणि ३०० धावांनी पराभव करून इतिहास रचला आहे. ८ जून २०२६ रोजी संपलेल्या या सामन्यातील विजय हा धावांच्या फरकानं भारताच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील आजवरचा सर्वात मोठा ऐतिहासिक विजय ठरला आहे.
या सामन्यात भारतानं टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतानं पहिल्या डावात कमालीची आक्रमक फलंदाजी करत १२७ षटकांत ८ गड्यांच्या मोबदल्यात ५६४ धावांवर आपला डाव घोषित (Declared) केला. प्रत्युत्तरात फलंदाजीसाठी उतरलेला अफगाणिस्तानचा पहिला डाव अवघ्या १५२ धावांवर ऑलआऊट झाला. पहिल्या डावात तब्बल ४१२ धावांची मोठी पिछाडी मिळाल्यामुळे भारतानं अफगाणिस्तानला फॉलोऑन (Follow-on) दिला. दुसऱ्या डावातही अफगाणिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली आणि त्यांचा संपूर्ण संघ अवघ्या ११२ धावांवर ऑलआऊट झाला, ज्यामुळे भारतानं ३०० धावांच्या फरकानं महाविजय मिळवला.
या संपूर्ण सामन्यात भारताचा कर्णधार शुभमन गिल यानं सर्वाधिक १२६ धावांची (१७७ चेंडू, १५ चौकार, १ षटकार) झंझावाती शतकी खेळी खेळली. गिल व्यतिरिक्त सलामीवीर के. एल. राहुलनं १०० धावांचं तर ऋषभ पंत आणि साई सुदर्शन यांनी प्रत्येकी ८१-८१ धावांचं मोलाचं योगदान दिलं. अफगाणिस्तानकडून पहिल्या डावात रहमत शाहनं सर्वाधिक ६० धावा केल्या. पण त्याच्याव्यतिरिक्त अफगाणिस्तानच्या कोणत्याही फलंदाजाला म्हणवी तशी कामगिरी करता आली नाही.
एकतर्फी सामना
हा सामना पहिल्या डावात भारताच्या महाकाय ५६४ धावांच्या जोरावर आणि त्यानंतर पदार्पण करणाऱ्या २३ वर्षीय फिरकीपटू मानव सुथारच्या घातक गोलंदाजीमुळे पूर्णपणे भारताच्या बाजूनं फिरला. सुथारनं पहिल्या डावात अवघ्या ३३ धावा देऊन ६ बळी टिपले, ज्यामुळे तो सामनावीर (Player of the Match) ठरला. दुसऱ्या डावात वॉशिंग्टन सुंदरनं ४ आणि कुलदीप यादवनं ३ बळी घेत अफगाणिस्तानचं कंबरडं मोडलं. त्यामुळे हा सामना पुर्णपणे भारताच्या बाजूनं म्हणजेच एकर्फीच झाल्याच चित्र झालं.
हेड-टू-हेड रेकॉर्ड
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण २ कसोटी सामने खेळवले गेले आहेत. या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघानेच विजय मिळवला असून अफगाणिस्तानला अद्याप भारताविरुद्ध एकही कसोटी सामना जिंकता आलेला नाही. यापूर्वी २०१८ मध्ये अजिंक्य रहाणेच्या कर्णधारपदाखाली खेळवल्या गेलेल्या बेंगळुरू येथे पहिल्या कसोटीत भारतानं एक डाव आणि २६२ धावांनी विजय मिळवला होता.

