T20 2026 Shreyash iyer: भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) आज (शनिवार, ६ जून २०२६) आगामी आंतरराष्ट्रीय दौऱ्यांसाठी भारतीय टी-२० (T20I) संघाची अधिकृत घोषणा केली आहे. या निवडीमध्ये अजित आगरकर यांच्या निवड समितीनं अत्यंत धाडसी निर्णय घेत, यंदा मार्चमध्ये भारताला टी-२० विश्वचषक जिंकून देणाऱ्या ३५ वर्षीय सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) संघातून पूर्णपणे वगळलं आहे. त्याच्या स्टार फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) भारताचा नवा टी-२० कर्णधार बनला असून, युवा फलंदाज तिलक वर्माला उपकर्णधारपदाची धुरा देण्यात आली आहे.
कोणत्या सामन्यांसाठी झाली निवड?
BCCI ने जाहीर केलेला हा १६ सदस्यीय संघ आगामी आयर्लंड विरुद्धच्या दोन सामन्यांच्या (२६ आणि २८ जून) आणि त्यानंतर होणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी (१ ते ११ जुलै) खेळताना दिसेल. याशिवाय हाच संघ सप्टेंबरमध्ये होणाऱ्या ‘आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६’ (Asian Games) मध्येही भारताचे प्रतिनिधित्व करेल.
या नव्या खेळाडूंना मिळाली संधी
या संघ निवडीतील सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आयपीएल २०२६ मध्ये ७७६ धावा कुटून ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या १५ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशीला (Vaibhav Sooryavanshi) पहिल्यांदाच वरिष्ठ राष्ट्रीय संघात स्थान मिळालं आहे. तो सचिन तेंडुलकरनंतर भारतीय संघात निवडला गेलेला सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. त्याच्यासोबत आयपीएल गाजवणारा अनकॅप्ड वेगवान गोलंदाज प्रिन्स यादव, अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी आणि फिरकीपटू रवी बिश्नोई यांना संघात मोठी संधी देण्यात आली आहे.
Presenting #TeamIndia's T20I squads for the tours of England & Ireland 2026 🇮🇳#ENGvIND | #IREvIND pic.twitter.com/f84kSSAIDf
— BCCI (@BCCI) June 6, 2026
कोणाला वगळण्यात आले आणि कोणाला विश्रांती?
सूर्यकुमार यादव याला सतत चालू असलेल्या खराब फॉर्ममुळे कर्णधारपद काढून घेत थेट संघातून वगळण्यात आलं आहे. त्याच्या जोडीने विश्वचषक विजेत्या संघातील रिंकू सिंग आणि कुलदीप यादव यांना देखील संघातून डच्चू मिळाला आहे. तर अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह यांना वर्कलोड मॅनेजमेंट अंतर्गत या दौऱ्यासाठी विश्रांती (Rest) देण्यात आली आहे. संजू सॅमसन, ईशान किशन आणि अभिषेक शर्मा यांनी संघात आपलं स्थान कायम राखलं आहे.
२०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक आणि आगामी विश्वचषकाच्या दृष्टीनं युवा संघ तयार करण्याचा बीसीसीआयचा हा मुख्य दीर्घकालीन उद्देश असल्याचं स्पष्ट झालं आहे.

