AFC U20: भारतीय 20 वर्षांखालील महिला संघ, 24 खेळाडूंसह, एएफसी 20 वर्षांखालील महिला आशियाई चषक स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. भारतीय अंडर-20 (U20) महिला फुटबॉल संघाने तब्बल 20 वर्षांनंतर एएफसी (AFC) U20 महिला आशियाई चषक 2026 साठी पात्र ठरून इतिहास रचला आहे. या ऐतिहासिक कामगिरीनंतर आता संपूर्ण देशाचे लक्ष थायलंडमध्ये होणाऱ्या मुख्य स्पर्धेकडे लागले आहे.
भारताने किती वर्षांनंतर या स्पर्धेत पुनरागन केलं आहे?
भारतीय महिला फुटबॉलसाठी 2026 हे वर्ष सुवर्ण अक्षरात लिहिले जाणार आहे. म्यानमारमध्ये झालेल्या पात्रता फेरीत यजमानांचा पराभव करून भारताने 2006 नंतर पहिल्यांदाच या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत आपली जागा पक्की केली आहे. स्वीडिश प्रशिक्षक जोआकिम अलेक्झांडरसन यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ आता आशियातील दिग्गज संघांशी भिडण्यासाठी सज्ज झाला आहे.
भारतीय संघाचे नेतृत्व कोणाकडे आहे?
यावर्षी होणाऱ्या या स्पर्धेचं नेतृत्त्व भारतीय संघाची डिफेंडर शुभांगी सिंग करणार आहे. तिच्या नेतृत्वाखाली संघाने नुकताच स्वीडनमध्ये एक महिन्याचा सराव दौरा पूर्ण केला असून तिथे स्थानिक वरिष्ठ क्लब संघांविरुद्ध 5 मैत्रीपूर्ण सामने खेळले आहेत.
या स्पर्धेत किती संघ खेळणार आहेत आणि भारताचे सामने कोणाविरूद्ध आहेत?
भारताचे सर्व साखळी सामने थायलंडमधील पाथुम थानी येथे खेळवले जातील. भारतीय संघाचा पहिला सामना (2 एप्रिल 2026) जपानविरूद्ध होणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया (5 एप्रिल 2026) आणि (8 एप्रिल 2026) चिनी तैपेई विरुद्ध होणार आहे.
प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ आणि दोन सर्वोत्तम तिसऱ्या क्रमांकाचे संघ उपांत्यपूर्व फेरीत (Quarter-finals) प्रवेश करतील. या स्पर्धेतील चार उपांत्य फेरीतील (Semi-finalists) संघ पोलंडमध्ये होणाऱ्या 2026 फिफा (FIFA) U20 महिला विश्वचषकासाठी थेट पात्र ठरतील.

