AFC U-20: थायलंडमध्ये सुरू असलेल्या एएफसी अंडर-20 महिला आशियाई चषक स्पर्धेत पुन्हा एकदा निराशाच हाती लागली आहे. कारण भारतीय संघाला पुन्हा एकदा मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. रविवारी, 5 एप्रिल 2026 रोजी पाथुम थानी स्टेडियमवर झालेल्या गट ‘क’ मधील सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियानं भारताचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला. पहिल्या सामन्यात जपानकडून 6-0 ने पराभूत झाल्यानंतर आता ऑस्ट्रेलिया संघानंही भारतीय संघाचा पराभव केला आहे.
सामन्याच्या सुरुवातीला भारतीय संघानं काही काळ चिवट झुंज दिली आणि 30 मिनिटांपर्यंत ऑस्ट्रेलियाला गोल करण्यापासून रोखून धरलं होतं. मात्र, खेळाच्या 38 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर ऑस्ट्रेलियाच्या स्काय हॅल्मरिकनं गोल केला. या धक्क्यातून भारत सावरत नाही तोच, अवघ्या एका मिनिटांत (39 व्या मिनिटाला) हॅल्मरिकनं वैयक्तिक दुसरा गोल नोंदवत मध्यंतरापर्यंत ऑस्ट्रेलियाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली.
दुसऱ्या सत्रातही हॅल्मरिकचा फॉर्म कायम राहिला आणि तिनं 48 व्या मिनिटाला आपला तिसरा गोल पूर्ण करत शानदार हॅट्ट्रिक केली. त्यानंतर डॅनेला ब्रूटस (54 व्या मिनिटाला) आणि डेझी ब्राउननं injuri time मध्ये 90 व्या मिनिटाला 4 गोल केले. शेवटी भारताचा 5-0 अशा मोठ्या फरकानं पराभव निश्चित केला.
भारतीय संघ सध्या Group C मध्ये असून, सलग दोन मोठे पराभव पत्करावे लागल्यामुळे संघ शून्य गुणांसह गुणतालिकेत सर्वात शेवटच्या (चौथ्या) स्थानावर आहे. भारतानं या स्पर्धेत आतापर्यंत खेळलेले दोन्ही सामने गमावले असून अद्याप एकही विजय किंवा गोल नोंदवता आलेला नाही. बाद फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्याच्या भारताच्या आशा आता कमी झाल्या आहेत.
प्रशिक्षक जोआकिम अलेक्झांडरसन यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ आता आपला शेवटचा गट सामना बुधवार, 8 एप्रिल 2026 रोजी चायनीज तैपेई विरुद्ध खेळणार आहे. स्पर्धेतून सन्मानजनक निरोप घेण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

