IPL Vaibhav: राजस्थान रॉयल्सचा युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशी यानं चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्धच्या सामन्यात केलेल्या झंझावाती खेळीनंतर त्याच्या भारतीय संघातील प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं आहे. मोहम्मद कैफ आणि मायकल वॉन यांसारख्या दिग्गजांनी वैभवला त्वरित भारतीय संघात घेण्याची मागणी केल्यानंतर भारताचा माजी फिरकीपटू आर. अश्विननं यावर वैभव सूर्यवंशीला भारतीय क्रिकेट संघात घाईनं स्थान देऊ नये, तो फक्त 15 वर्षांचा असून योग्य वेळ आल्यावरच तो स्वत: हून पुढं येईल, असं विधान केलं आहे.
नेमका वाद काय आहे?
सोमवारी (30 मार्च) गुवाहाटी येथे झालेल्या सामन्यात वैभवनं फक्त 15 चेंडूंत 50 धावा केल्या. या खेळीनंतर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव झाला. मोहम्मद कैफ आणि मायकल वॉन यांच्यासारख्या दिग्गजांनी वैभव सूर्यवंशीच्या टीम इंडियातील पदार्पणाला पाठिंबा देण्याविषयी टिप्पणी केली.
मात्र या दिग्गजांच्या विधानानंतर 31 मार्च रोजी आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना तो म्हणाला, “वैभव हा अजून फक्त 15 वर्षांचा मुलगा आहे. आपण त्याला आत्ताच ‘टीम इंडिया’चं ओझं देऊन त्याच्यावर विनाकारण दबाव का टाकत आहोत? त्याला त्याच्या नैसर्गिक खेळाचा आनंद घेऊ द्या. जर तो वयाच्या 40 व्या वर्षापर्यंत खेळणार असेल, तर त्याच्याकडं अजून 20 वर्षांपेक्षा जास्त कारकीर्द शिल्लक आहे. मग इतकी घाई कशासाठी? योग्य वेळ आल्यावर तो स्वतःहून पुढं येईल”.
कालच्या सामन्यात वैभवनं (30 मार्च 2026) चेन्नईविरुद्ध 17 चेंडूंत 52 धावा केल्या. त्यात त्यानं 4 चौकार आणि 5 षटकार लावले. तसेच 15 चेंडूंत अर्धशतक झळकावून तो आयपीएल इतिहासातील सर्वात तरुण वेगवान अर्धशतकवीर ठरला. त्यानं गेल्या वर्षी वयाच्या 14 व्या वर्षी पदार्पण केलं होतं. 7 सामन्यांत 252 धावा करून त्यानं आपली झलक दाखवून दिली होती. यावर्षीसुद्धा त्यानं चांगली सुरूवात केली आहे. त्यामुळे पुढचेही सामने वैभव कसा खेळणार, याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.

